राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर नव्याने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी या दोघांनी भाजपाच्या नेत्यांची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीत आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आढावा घेत निर्देश दिले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे फोनवरूनच कामे करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओबाबत विचारले असता अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या त्या व्हिडिओवरून म्हणाले की, तुम्हा पुणेकर पत्रकारांना माझ्या कामाची पद्धती चांगलीच माहिती आहे. मी पण अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण त्यावेळी कॅमेरा चालू करायला सांगत नाही, असे म्हणत पवारांनी शिंदेंना खोचक टोला लगावला.
त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीसाठी वितरीत केलेल्या निधीला स्थगिती दिली. त्यावरून अजित पवार म्हणाले की, आमच्या काळातील डीपीडीसी निधी या सरकारने रद्द केला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, सरकार बदललं म्हणून विकासाचा निधी रद्द करायचा नसतो, असेही ते म्हणाले.
सरकार येत असतात, सरकार जात असतात. मात्र, स्वतःचा राजकीय हट्ट सोडून जनतेच भल काय आहे. पुढचा विचार करून फायदा कश्यात आहे याचा विचार केला पाहिजे. सरकार बदललं म्हणून उठसूठ सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी आम्ही याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.