मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा- विदर्भ विषयावरील २९३ च्या विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लायवर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात एकही महिला सदस्या नसल्याची खंत व्यक्त करत याची तक्रार मिसेस फडणवीस यांना सांगू का असा सवाल करत मंत्रीमंडळाचा विस्तार करा असे सांगत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले माझ्याकडे बघून सारखे दाढी-मिश्यावरून ताव मारतात अशी तक्रार केली.
त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, हे बोलण्याआधी सुनेत्रा वहिनींना विचारलं होत का? असा सवाल करत तुम्हाला मुख्यमंत्री करण्याची संधी असतानाही शरद पवार यांनी केले नसल्याचे सांगत अजित पवारांच्या दुखत्या मर्मावर बोट ठेवले.
अजितदादांनी आज अनेक गोष्टींची चर्चा केली कोण मुख्यमंत्री झाले? कुठले मुख्यमंत्री झाले असं अजितदादा म्हणाले. पण एका गोष्टीचं दुःख मला वाटतं आहे. संधी मिळाली असतानाही अजितदादांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. २००४ मध्ये संधी होती. तुमचे जास्त लोकं निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार होता. पण ती संधी तुम्हाला मिळाली नाही असं म्हणत अजित पवार यांना विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार टोला लगावला.
अजित पवार यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं. पण, यंदा १०० टक्के भाषण अजित पवारांचं वाटत नव्हते. ५० टक्के जयंत पाटील यांचही होतं. जयंत पाटील सभागृहात नसल्याने अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास तुमच्या भाषणातून होत होता. वीज तोडण्याचा जीआर मी ट्वीट देखील केला. फेसबुकर टाकला आणि सगळ्यांना पाठवला देखील, तरीही तुम्हाला कसं काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्वीटरवर फॉलो करा, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.
अजितदादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तुमच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. याबाबत अमृता वहिनींना सांगू का ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते. आता तुम्ही सरकारमध्ये काम करत आहात. तुम्हाला ठाणे जिल्ह्यात काम करताना किती अडचणी येतात स्वतःला विचारावा. तीच गोष्ट पालघर जिल्ह्याच्या बाबतीत घडते आहे. शिंदे गटाचं कुणी आलं की त्याचं काम लगेच होतं. चंद्रकांतदादा किंवा मुनगंटीवार कुणीही विरोध करा पण ही वस्तुस्थिती आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आमचं सरकार असताना जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कधी इगो आड आला नाही असंही अजितदादा म्हणाले होते.
दरम्यान, आता महिला मंत्री झाल्याशिवाय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असे सांगत भले कोणी कितीही वेळा कोट पँट शिवली तरी त्यांचा समावेश करणार नाही अशी मिश्किल टीपण्णी करत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची टर उडविली.