हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून विरोधकांच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील अनुशेषाच्या अनुषंगाने नियम २९३ खाली प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी मराठवाडा आणि विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी काही सूचना केल्या तर काही जणांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
या संपूर्ण झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरील आधीच्या आरोपांवरून टोला लगावत अप्रत्यक्षरित्या इशारा दिला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना म्हणाले, हिवाळी अधिवेशनासाठी अनेक आमदार समृध्दी महामार्गावरून नागपूरला आले. या महामार्गावरून आल्याने अवघ्या आठ तासात मुंबई, नागपूरचे अंतर पूर्ण होते. त्यामुळे मुंबई-नागपूरचा प्रवास कमी वेळेत पूर्ण होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या स्वतःच्या पैशातून पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प पूर्ण असून आम्हाला समृध्दी महामार्गाचा गोसीखुर्द प्रकल्प होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प तातडीने पूर्ण केला असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.
गोसीखुर्द प्रकल्पावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर आरोप झाले होते. तसेच गोसीखुर्दच्या वाढत्या प्रकल्प खर्चामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाची सुई फिरली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सावरत म्हणाले, हे तुमच्यावर जूने होते. त्याचा आता काहीही संबध नाही. त्यात मला जायचेही नाही. पण गोसीखुर्दचे काम मोठे झाले. पण जमिन सिंचनाखाली आलीच नाही असे मी म्हणत नाही तर बाबा (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण) त्यावेळी म्हणत होते. हे त्यांचे वाक्य होते. मी बोलत नसल्याचे सांगत स्वतःची सुटकाही करून घेतली.