Breaking News

हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राहुल गांधी यांना आव्हान

मराठी ई-बातम्या टीम

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राहुल गांधी यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी आपण हिंदू आहोत पण हिंदुत्ववादी नाही, असे वक्तव्य केले. त्यावर प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील आव्हान दिले.

राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांच्या संभ्रम दर्शविते. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होत होती आणि मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी होते. ते हटविण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे. केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे. तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाच्या भरती परीक्षेत भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली. प्राथमिक अहवालानुसार म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटण्याचा संबंध थेट मंत्रालयापर्यंत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वांच्या आयुष्याशी खेळत आहे. एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी, आरोग्य विभाग भरती परीक्षा देणारे उमेदवार, म्हाडा भरतीसाठीचे उमेदवार, मराठा समाज, ओबीसी, अनुसूचित जाती – जमाती, शेतकरी अशा सर्वांच्या आयुष्याशी खेळ करून महाविकास आघाडी सत्तेचा उपभोग घेण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *