भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना आपण मागील ३९ वर्षांपासून ओळखतो, अगदी लहान असल्यापासून त्यांना पाहिलं आहे. त्यांना काहीही येत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.
घटनास्थळी उपस्थितीतांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंना उद्देशून राणे पुढे म्हणाले की, त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली होती. पण हे सगळं महाराष्ट्र कसं सहन करत होता? हेच मला कळत नाही. त्या माणसाला काहीच येत नाही. मी ३९ वर्षे त्या माणसाला जवळून पाहिलं आहे. अगदी लहान असल्यापासून पाहिलं आहे. त्याला काहीही येत नसल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात सत्कार करताना नारायण राणे यांना ‘पुरुषार्थ’ नावाचं पुस्तक भेट देण्यात आलं. यावरूनही राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हे पुस्तक मला नाही, उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे उत्तर देताना म्हणाल्या, नारायण राणे मातोश्रीच्या अंगणात उमलणाऱ्या चाफ्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण तुमच्या अंगणात असलेली जी दोन धोतऱ्याची फुलं उमलली आहेत त्याकडे लक्ष द्या असा खोचक टोला त्यांनी नितेश आणि निलेश राणे यांचे नाव न घेता लगावत प्रत्युत्तर दिले.