Breaking News

अंबादास दानवेंचा इशारा, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी प्रकरणी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार सदा सरवणकर यांच्यावर अद्याप कारवाई का केली जात नाही

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी व पत्रकारांवरील हल्ले प्रकरणी सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानभवन येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पत्रकार शशिकांत वारिसे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्याठिकाणी दानवे यांनी भेट दिली. हत्या झाली तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. संबंधित तपास करणाऱ्यांवर दबाव आणला जातोय हे धक्कादायक असल्याचा आरोपही केला.
गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे, तरी दोषी असलेल्या सरवणकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. एकप्रकारे सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे भांडुप झोन अदाणी वीज कंपनीला देऊन महावितरणचे खासगीकरण करण्याचा डाव सरकार आखत आहे.

मविआ सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगार व इतर मागण्यांसाठी आंदोलन केली गेली, मात्र आजही तिच स्थिती आहे. न्यायालयाने आदेश देऊनही व कर्मचाऱ्यांनी आंदोलन करूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नसल्याचा मुद्दा दानवे यांनी अधोरेखित केला.

दावोस येथे दिलेल्या भेटीनंतर सरकारने १ लाख रोजगार देणार असल्याच्या घोषणा केल्या, मात्र नेमके कोणते करार केले याबाबत कोणतीही सुस्पष्टता सरकारने दिली नाही.

संभाजीनगर व धाराशिव नामांतराचा सुधारित आदेश केंद्राने काढावा, अशी मागणी देखील दानवे यांनी केली.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव न देता सरकार ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

मविआच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांची भेट
मुंबई – महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते व आ. अनिल परब, शिवसेना प्रतोद व आ. सुनील प्रभू, आ. छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. कपिल पाटील, उपस्थित होते.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊ

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे मद्य धोरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *