सध्या चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यातील मुद्दे यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आज भाषणातही अजित पवारांनी सरकारवर विविध मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल केला. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईबद्दल उद्या सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
आज पाथर्डीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्यावेळी नेमक्या त्याचवेळी समोर बसलेल्या लोकांमधून एकाने अचाकन दुष्काळी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
या व्यक्तीने अजित पवारांना दुष्काळी अनुदानाबाबत विचारणा केली. “अजितदादा, अजूनपर्यंत या सरकारनं दुष्काळी अनुदान दिलेलं नाही”, असं या व्यक्तीने म्हणताच अजित पवारांनी “आरे ते सांगतायत दिलं होतं. उद्या मी तेच त्यांना विचारणार आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं. मात्र, तरीही या व्यक्तीचं समाधान झालं नाही. त्यानंतरही अजित पवारांच्या बोलण्यात मध्ये बोलत या व्यक्तीने “तुमच्या काळात अनुदान मिळत होतं. या खोके सरकारने अजून अनुदान दिलेलं नाही”, असं म्हणताच अजित पवारांनी त्यावर त्या व्यक्तीलाच मिश्किलपणे सुनावलं. “तू आमदार निवडून दिला असता तर कशाला खोके सरकार निवडूण आलं असतं. शेवटी परत तुझ्यावरच येतंय बघ”, असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आमचं काम मी टाळत नाही, नाकारत नाही. जी जबबादारी आम्ही स्वीकारली आहे, ती आम्ही तडीस नेणार. पण हे करत असताना आम्हाला तुमचंही सहकार्य पाहिजे. महागाई वगैरे वाढते म्हणून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय. कुठल्या धर्मानं संगितलंय एकमेकांचा व्देष करायला? असे सांगत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.