वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा-एअरबस सारखा मोठा आणि महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच आता सॅफ्रन या विमान आणि रॉकेटसाठी इंजिन बनविणारी कंपनीचा नियोजित नागपूर मिहानमधून थेट हैद्राबाद येथे स्थलांतरीत झाल्याची माहिती हाती येत आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाने यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत म्हणाले, सलग तीन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जातात. यावरून राज्य चालवायला लायक नसल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने सरळ राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला सामोरे जावे असे आव्हान शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
यावेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, गुजरातमध्ये भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत. राज्यात वेदांतचा प्रकल्प येईल, अस छातीठोकपणे मुख्यमंत्री बोलले होते. मात्र, तसं झालं नाही. एअरबसच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आणि आता जखमीवर मीठ चोळणारी घटना म्हणजे सॅफ्रन कंपनीही हैदबादला जात आहे, त्यामुळे आता राज्य सरकारने महाराष्ट्राला ‘जय महाराष्ट्र’ करत सत्तेतून बाहेर पडावे असा खोचक सल्ला दिला.
राज्यातील डबल इंजिनच्या सरकारचे एक इंजिन फेल असून ते सध्या उलटा प्रवास करते आहे. एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ज्या सरकारकडून रोजगार निर्मिती, महागाई किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा महत्त्वाच्या प्रश्वांकडे हे सरकार दुर्लक्ष होते आहे, या गोष्टीचं वाईट वाटतं. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला आणि लागली किरकिरायला’ अशी सद्याची परिस्थिती आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.