राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगावातील पाचोऱ्यात आज येत आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सभेपूर्वीच एकमेकांवर टीका टीपण्णीचे वाक्ययुध्द चांगलेच रंगल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. या सगळ्या वाक्ययुध्दात खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका करत गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात ४०० कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला. तसेच जळगावात गुलाबो गँग असल्याची खोचक टीका केली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जळगावमध्ये गुलाबो गॅंग आहे. ज्यांनी ५० कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे लोक शिवसेनेच्या मेहेरबानीने निवडून आले आणि मग विकले गेले. ते आज आम्हाला धमक्या देत आहेत. पण जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, अशी खोचक टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना म्हणाले, माझ्याकडे गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चढ्या भावात वस्तूंची खरेदी केली होती. यामध्ये ऑक्सिजन व्हेंटीलेटर्सचाही समावेश होता. त्यावेळी दोन लाखांचं व्हेंटीलेटर १५ लाखांना खरेदी केले गेले. महत्त्वाचे म्हणजे या भ्रष्टाचारावर त्याच गँगचे सदस्य चिमणराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. हा घोटाळा साधारण ४०० कोटी रुपयांचा आहे. मात्र, हे प्रकरण दाबलं जात आहे, असा आरोपही केला.