राज्यात अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला माहिती दिली.
पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टर, नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टर, धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानीसंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
विरोधकांचे मगरीचे अश्रु – उपमुख्यमंत्री
सरकारवर टिका करत सभात्याग करणार्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांना शेतकर्यांशी काही देणेघेणे नाही आहे. यांना केवळ शेतकर्यांच्या प्रश्नांवरून राजकारण करायचे आहे. यांचे सरकार असताना त्यांच्या काळात झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे सात हजार कोटी आमच्या सरकारने दिले, असे सांगत फडणवीस यांनी विरोधक हे शेतकर्यांच्या बाजूने नाही आहेत, त्यांचे अश्रु हे मगरीचे अश्रु आहेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.