आगामी पालिका आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेले नसले. तरी यासंदर्भात उध्दव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी आंबेडकर-ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीला दुजोरा दिला. तसेच आघाडीबाबतची चर्चा लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर ती अधिकृतरित्या जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रसारमाध्यमांनी आज झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. त्यावर उध्दव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जसे आम्ही महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष एकत्र आलो आहोत. आम्ही फक्त सत्तेसाठी एकत्र आलो नाही, तर आता विरोधात असतानाही आम्ही एकत्र आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर आम्ही चर्चा करणार असून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहोत. तसेच वंचित आघाडीबरोबरची चर्चा सकारात्मक झाली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीत येण्याची मानसिकता असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
तर ‘वंचित’ला महाविकास आघाडीत घेण्याविषयी आम्ही सकारात्मक आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतेही प्रतिक्रिया अथवा भूमिका आलेली नाही.
वांद्रे येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी दीड तास चर्चा झाली. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत व आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यात ‘वंचित’ला बरोबर घेण्याबाबत उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांकडून शिक्कामोर्तब केल्याचे समजते. काँग्रेसने हा विषय आमच्या (राज्य) पातळीवरचा नसून, याबाबत केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल, अशी सावध भूमिका घेत सध्या तरी आंबेडकरांसोबतच्या आघाडीबाबत भाष्य करणे टाळले आहे.