छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. यामध्ये तरुणांनी दगडफेक करत पोलिसांसह खाजगी वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर गुरूवारी रात्री मुंबईतील मालवणी येथे रामनवमीच्या शोभायात्रे दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या दोन्ही घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच उद्या रविवारी औरंगाबादेत महाविकास आघाडीची पहिलीच सभा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सध्याच्या सामाजिक, राजकिय परिस्थितीसह सावरकर प्रश्नीही आपली भूमिका मांडली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, यावर काही राजकीय लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. पण, या सगळ्यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे. तसेच, हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी करावी, असा सल्ला राजकीय देताना एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी, अशी सूचनाही केली. .
शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरातील गडकरींच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात ही दुसरी भेट आहे.
शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील शेतीच्या प्रश्नांबरोबरच राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणावर बोलताना स्पष्टपणे सांगितले की, राज्यातील आणि देशातील अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत. तसेच त्याविषयी आमच्यामध्ये चर्चा होते, आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न आहेत, मात्र सावरकर हा राष्ट्रीय इश्शू नाही असंही यावेळी स्पष्ट केले.
विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुरु करण्याचे फायदे सांगताना शरद पवार यांनी सांगितले की, विदर्भ आणि खान्देशातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात ज्या प्रकारे सोयाबीन पिकवले जाते, त्याच प्रमाणे जर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना प्रचंड होणार असल्याचेही सांगितले.
देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थिती विषयी बोलताना सांगितले की, भाजपाचे मिशन ४०० हा प्रयोग माझ्या गावातून म्हणजे बारामतीतून चालू होत आहे.
याचा मला अभिमान आहे. त्यावर विरोधकांकडून असा काही प्रयोग चालू आहे का असा सवाल उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, प्रयोग चालू नसला तरी, त्याबाबत विचार विनिमय चालू आहे. मात्र असं भाजपासारखं आम्ही अजून काही जाहीर केलं नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.