काही दिवसांपूर्वी भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत कागदपत्रासह आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याचे आवाहन केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संजय राऊत यांनी थेट सीबीआय यंत्रणेचा दरवाजा ठोठावत भीमा-पाटस सकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याची माहिती ट्विटद्वारे संजय राऊत यांनी दिली. तसेच काही कागदपत्रेही संजय राऊत यांनी ट्विट केली. त्यामुळे राहुल कुल यांची आता सीबीआयकडून चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आणि भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार केल्याचंही राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आता त्यावरून त्यांनी फडणवीसांना लक्ष्य करतानाच सीबीआयकडे तक्रार दाखल केल्याचं जाहीर केले.
संजय राऊतांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती देताना म्हणाले, मी सीबीआय कडे यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही तक्रार मी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघुयात पुढे काय होतंय, असं आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगितले.
मी दोन वेळा या प्रकरणाचे डिटेल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवले. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे. मी भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी मला अद्याप वेळ दिलेली नाही, असं संजय राऊत यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले. मधल्या काळात फडणवीस म्हणाले की मी गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण होतेय. माझ्या आशा पल्लवित झाल्या. मी त्यांच्याकडे पुन्हा हे प्रकरण पाठवलं. तेव्हाही त्यावर काही कारवाई झाली नाही. तेव्हा मला लक्षात आलं की फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे त्यांच्या पक्षात असणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण मिळालं. ५०० कोटींचा अर्थिक घोटाळा पुराव्यांसकट मी दिला, तरीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच विरोधी पक्षातले नेते निवडून निवडून तुरुंगात टाकले जात आहेत, असंही संजय राऊत माध्यमांना म्हणाले.
I have filed a formal complaint with the @CBIHeadquarters regarding Bhima Patas Cooperative Sugar Mill's #MoneyLaundering of 500 crores.
Since Mr @Dev_Fadnavis has turned a blind eye towards my complaint, I have knocked the CBI's doors. Let's see what happens next!@dir_ed… pic.twitter.com/NM3y3VbfcG
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2023