मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबई शहरासाठी सार्वजनिक वाहतूकीच्या दृष्टीकोनातून नियोजित मेट्रो ३.४.६ प्रकल्पाकरीता नुकतीच राज्य सरकारने कांजूर मार्ग येथील जागेची निवड केली. मात्र या जमिनीवरून केंद्र सरकार न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले. अशा प्रसंगी राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मार्गदर्शन करत असतात. मात्र याप्रश्नी पवार यांनी पुढाकार घेतल्यास कांजूर मार्गचा प्रश्नी निकाली निघू शकतो अशी भूमिका शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
कांजूर मार्ग प्रश्नी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कांजुरमार्गच्या जागेवर जे कारशेड तयार करण्याचा निर्णय घेतला होता तो हिताचाच होता. १ कोटी पेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झाला असता. केंद्रानं सहकार्य करणं गरजेचं होतं. परंतु केंद्र सरकार मिठागराचे आयुक्त न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनले आहे. त्यामुळे याविषयावर अधिकचे बोलता येत नसल्याचे सांगत याप्रकरणी अधिकचे बोलण्याचे टाळले.
मात्र कांजूर मार्गप्रश्नी निर्माण झालेल्या अडचणीवर आणखी काही जागांचे पर्याय तपासले जात आहेत. जो पर्याय चांगला असेल तो निवडला जाईल. त्यासाठी बीकेसीतील जागेसह अन्य काही जागांची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.