राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यालयाचा परवाना मिळविताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने विभागाने समीर वानखेडे यांचा परवाना रद्द केल्यानंतर त्या विरोधात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र याचिका काल दाखल झाली आणि आज लगेच सुणावनीसाठी समोर आल्याचे बघुन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल हे आश्चर्य चकीत होत, “कोणतीही याचिका न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्याला तीन दिवसानंतरची तारीख दिली जाते. मग इतक्या तातडीने ही याचिका आमच्यासमोर सुणावनीला आली कशी ?” असा संतप्त सवाल न्यायालयाचे कर्मचारी वर्गाला आणि वकीलांना करत सुणावनी घेण्यास नकार दिला.
मद्यालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि रद्द केलेला परवाना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या.
विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा याचिका दाखल केल्या होत्या. काल याचिका करण्यात आली आणि आज लगेच सुनावणीला आली. यामुळे खंडपीठ संतप्त झाले. मद्य परवाना रद्द केल्याप्रकरणी याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी संतप्त होऊन आपल्या कर्मचाऱ्यांना फटकारले.
सामान्यांना नियमानुसार अनुक्रमाने सुनावणी मिळणार आणि कोणी प्रभावी व्यक्ती असेल तर तातडीने सुनावणी मिळणार, असे आहे का? ही न्यायव्यवस्था अशासाठी आहे का?, अशा शब्दांत खंडपीठाने वानखेडे यांच्या वकिलांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच सुणावत. मद्य परवान्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज काय? आज सुनावणी घेतली नाही तर आकाश कोसळणार आहे का? अशी खोचक विचारणाही न्यायालयाने केली. त्यानंतर याप्रकरणावरील सुणावनी पुढील आठवड्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वानखेडे यांनी ज्या जलद गतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा काही त्यांना फायदा लगेच मिळेल असे दिसत नाही.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखडे यांचा मद्यालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला. वानखेडे यांनी सज्ञान नसताना म्हणजेच अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्या नावाने मद्यालयाचा परवाना काढला होता, ही बाब चौकशीत समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच राज्य उत्पादन विभागानेही त्यांच्या विरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याप्रकरणी समीर वानखेडे यांना पोलिसांनी चौकशीसाठी आज समन्स बजावत बुधवारी हजर होण्यास सांगितले.
समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांना दिलासा मिळाला नसतानाच ठाणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याने वानखेडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एनसीबीत कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्याचा सूड उगवण्यासाठी आपल्याविरोधात ही करण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही केली आहे.
भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मद्यालयाचा (बार) परवाना काढताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.