मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणात गर्दी ओसरली आहे. त्यापेक्षा आणखी कमी झाली पाहिजे मी म्हणतो की बंदच झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडत लोकल, बसेस आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेवू शकते मात्र नागरिकांनी स्वतःहूनच बाहेर पडणे, अनावश्यक प्रवास करणे बंद केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी गर्दी टाळण्याचे, लोकल रेल्वे, बसेस मधून अनावश्यक प्रवास करणे टाळण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य यंत्राना आपल्या सर्वांसाठी झटत आहे. त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण स्वतःहून सहकार्य करण्याची गरज असून हे सहकार्य केले तरच त्यांची कार्यक्षमता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशावर आलेले हे संकट हे परदेशी संकट असून या संकटाशी लढण्यासाठी एकजूटीची गरज आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या सूचना पाळा, त्याचे पालन करा सरकारने सांगितलेल्या गोष्टीशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करत हा आजार फक्त परदेशातून आलेल्या नागरिकांकडून पसरला आहे. त्यांच्या संपर्कात जे आले त्यांना या आजाराची लागण झालेली आहे. त्यामुळे या आजाराचा विषाणू हळूहळू पसरत असून त्याला रोखण्यासाठी आपणास गर्दी करणे टाळावे लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आजाराची चाचणी करण्यासाठी चाचणी केंद्रांची आवश्यकता होती. त्या आवश्यकतेनुसार चाचणी केंद्रे आता वाढविण्यात आली आहेत. या आजाराशी आपल्या बरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही लढत असल्याचे सांगून राज्याला लागणाऱ्या आवश्यक मदतीसाठी त्यांच्याबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्री ड़ॉ. हर्षवर्धन यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.