Breaking News

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आरेचे जंगल कागदावर… माहुलच्या प्रदुषण करणा-या कंपन्यांचा १४ हजार कोटींचा दंड उबाठाकडून माफ

तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत काय “करुन दाखवले?” तर मुंबईत बिल्डरांना ‍प्रिमियमची खैरात करुन सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करुन दाखवले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज पुन्हा केली.

मुंबईच्या हवा प्रदुषणात वाढ झाली असून गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबईतील हवेतील प्रदुषात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्वाला जबाबदार तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, असा आरोप केला.

या बाबत बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत आरेला जंगल घोषीत केले आणि स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली. पण ही घोषणा कागदावर असून प्रत्यक्षात उबाठाकडून मुंबईत बिल्डरांसाठी गेल्या १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली. बिल्डरांना “प्रिमियमचे खतपाणी” घातले त्यामुळे आजघडीला ६ हजार बांधकाम प्रकल्प एकाचवेळी सुरु झाले, त्यामुळे मुंबईत “सिमेंटचे जंगल” उभे केले. जी मेट्रो वाहनांची संख्या कमी करुन हवा प्रदुषण कमी करणार आहे ती मेट्रो आणि तीच्या कारशेडचे काम उबाठाने रोखून ठेवले. मुंबईतील कचऱ्यापासून गॅसची निर्मिती केली तर सुमारे ३५० कोटी रुपयांचा नैसर्गिक गॅस मुंबईला उपलब्ध होईल, पण त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. उलट गरज नसताना पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाची तयारी सुरु केली.

तसेच पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, माहुलच्या प्रदुषणकारी कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी आहे, पण तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उबाठा सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला १४ हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो ३०० कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली. कंपन्याना न्यायालयीन प्रक्रियेत मदत होईल अशी भूमिका घेतली आणि माहुलमधील “प्रदुषणाच्या भट्ट्या” धगधगत्या ठेवल्या. याबाबत आपण मागिलकाळात विधानसभेचे लक्ष वेधून सरकारकडे चौकशीचही मागणीही केली होती. अशा प्रकारे मुंबईत आज जे प्रदुषण होते आहे त्याला उबाठा आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका केली.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *