पुणे: प्रतिनिधी
आता पुणे फारच कंन्झेसटेड झालेले आहे. त्यामुळे नवं पुणे वसविण्याची गरज निर्माण झाली असून त्यादृष्टीने नव्याने जमिन पाहुन त्या ठिकाणी वाढीव पुणे स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या पुण्याला कोल्हापूर आणि सोलापूर व अहमदनगरला जलदगतीने जोडण्यासाठी एसटीच्या दरात मेट्रो सेवा सुरु करण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत ही मेट्रो सेवा एसटी तिकिट दराच्या किंमतीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथील एका रस्त्याच्या उद्घाटन समारंभा निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिल्ली ते मुंबई महामार्ग हा नरिमन पाँईट पर्यत जोडण्यात येणार असून नंतर तो पुढे ठाण्याच्या बाहेरून जेएनपीटीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नरिमन पाँईट ते नवी दिल्ली आता १२ तासात पोहोचता येणार आहे. याशिवाय वसई-विरारच्या बाहेरूनही हा महामार्ग जाणार असल्याचे सांगत यासंदर्भात नुकतीच हेलिकॉप्टरने पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुणे कोल्हापूर-सोलापूर-अहमदनगर या दरम्यान सुरु होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाची योजना ही ४० हजार कोटी रूपयांची असून या मेट्रोची गती १४० कि.मी प्रति तास अशी राहणार आहे. त्यामुळे २ ते ३ तासात पुणे हून सोलापूर तर पुणे –कोल्हापूर इतक्या कमी कालावधीचा प्रवास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय पुणे शहरातील प्रदुषण कमी करण्याच्यादृष्टीने माझी एक योजना असून पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. या कारखान्यात इथेनॉलचे प्रकल्प सुरु केल्यास राज्याला लागणाऱ्या इथेनॉलची प्रतिपूर्तता होवू शकेल. तसेच आगामी काळात सर्व प्रकारची वाहने बॅटरीवर आणि १०० टक्के इथेनॉलवर चालविण्याबाबत लवकरच नवा आदेश काढणार आहे. तसेच मर्सिडेंज बेंजपासून कोणतीही वाहने या पध्दतीने सुरु करण्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदुषण आपोआप कमी होईल आणि शेतकऱ्यालाही चांगली किंमत मिळेल असे सांगत बजाज कंपनीचे राहुल बजाज यांचा मुलगा आणि टिव्हीएस कंपनीचे एमडी मध्यंतरी माझ्याकडे आले होते, त्यावेळीही त्यांना मी हेच सांगितले की, तुमची उत्पादने इलेक्ट्रीक पध्दतीची निर्माण केल्याशिवाय माझ्याकडे येवू नका आणि त्याशिवाय मी तुमचे काम करणार नाही अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.
ब्राझिलमध्ये चार चाकी महागडी वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालविण्यात येत आहे. त्यामुळे तेथील प्रदुषण चांगल्यापैकी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.