हिंगोली: प्रतिनिधी
राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ मधील उमरखेड हा एक मतदारसंघ होता आणि पुढे २२ मतदारसंघात म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचारांचा प्रसार अधिक करायला हवा त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाडयात जिथे जिथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा गेली तिथे तिथे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटीही दिल्या. त्यामुळे महाविकास आघाडी किती भक्कमपणे काम करतेय हे यावरून स्पष्ट दिसतेय असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कसा समन्वय साधता येईल याबाबतही संवाद दौर्यात चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात विदर्भाची संवाद यात्रा काढली होती त्यामध्ये ८२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यातील ६२ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तर खान्देश जिल्ह्यातील २० मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईल त्यावेळी परभणी जिल्हयातून ही यात्रा सुरू करु असेही त्यांनी स्पष्ट केले.