मुंबई : प्रतिनिधी
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने ठाम भूमिका मांडावी यासाठी आज शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून विविध संघटनांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार असल्याचे आश्वासन शेतकरी नेते आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांना दिले.
केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवरांचा समावेश होता.