मुंबईः प्रतिनिधी
१० एप्रिल ९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालानुसार एका वर्षात देशभरात ११७७ दलितांच्या हत्या झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली. या अशा अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी १९७२ च्या काळात “दलित पँथर” नावाची संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना म्हणजे एक झंझावात होता. वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही दलित पँथर संघटनेने आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.
दलित पँथर या चळवळीतून प्रेरित असा सिनेमा असून ज्योत्स्ना फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्यावतीने या हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दलित पँथरचा धगधगता इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि लेखक-दिग्दर्शक हर्षमोहन कृष्णात्रेय यांचे आहे. या चित्रपटाच्या उद्घोषणाच्या वेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, जे. व्ही. पवार (दलित पँथर संस्थापक-सदस्य, साहित्यिक), अर्जुन डांगळे (दलित पँथर सदस्य, साहित्यिक), अॅड, जयदेव गायकवाड (माजी आमदार, दलित पँथर सदस्य) उपस्थित होते.