काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले आहेत. या घटनेला २४ तास पूर्ण होण्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक राजकीय प्रचार मोहीम राबवीत आहेत त्यामुळे सैनिकांविषयी त्यांचे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ढोंगीपणा उघड झाल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.
पुलवामा प्रसंगाच्या निमित्ताने सारा देश शोकसागरात बुडालेला असल्याने सर्वांनी राजकारणाचा विचार न करता यावेळी सरकारच्या पाठीमागे उभे रहावे अशी अपेक्षा विरोधी पक्षांकडून करणारे पंतप्रधान स्वतः मात्र देशभर स्वपक्षाचा प्रचार व देशभावनेचा उन्माद निर्माण करीत फिरत आहेत. पंतप्रधान स्वतः इतरांना उपदेश करत फिरत असले तरी जवानांची मृत शरीरे अंत्यविधीसाठी त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचण्यापूर्वीच ते सद्य स्थितीत देखील आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी फिरत आहेत. यातला विरोधाभास लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच वर्षापूर्वी ते यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे आले होते व त्यांनी शेतक-यांसोबत चाय पे चर्चा केली होती. आज त्यांनी त्याची आठवण करून दिली पण या गावातील एका कर्जबाजारी शेतक-याने मोदांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या केली होती, याचा मात्र त्यांना सोयीस्कर विसर पडला. आपल्या 2014 च्या भेटीची आठवण करून देताना या शेतक-याविषयी त्यांनी सहवेदना व्यक्त केली असती तर बरे झाले असते असा टोलाही त्यांनी लगावला.