नागपूर: प्रतिनिधी
भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केला.
१९७१ च्या युद्धात आजच्याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांग्लादेशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि भारतीय सैन्याने गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने आज निरर्थक घोषणाबाजी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केला.
ऐतिहासिक महापुरूषांच्या नावाखाली राजकारण करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अनेक महापुरूषांचा आपल्या सोयीने राजकीय वापर करून घेतला आहे. काही महापुरूषांमध्ये वाद होते, असे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व सरदार पटेल, महात्मा गांधी आणि शहिद भगतसिंग, पंडित नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महापुरूषांमध्ये नेहमीच वाद असल्याचा अपप्रचार केल्याची टीकाही त्यांनी केली.
महापुरूषांचा राजकारणासाठी वापर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आज विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. खा. राहुल गांधी यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत केलेला सावरकरांचा उल्लेख वेगळ्या संदर्भाने होता. त्यांनी देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या अनुषंगाने उचललेल्या मुद्यांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने जाणीपूर्वक नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या कारस्थानाला काँग्रेसने नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले असून, यापुढेही आम्ही ते काम करत राहणार असल्याचेही ते म्हणाले.
Tags ashok chavan bjp congress rahul gandhi v.d.savarkar
Check Also
वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …