मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा असेही ते म्हणाले.
विधानभवनात बोलताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनीम वरील माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना यांच्यात ट्विटरवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दरम्यान मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ही सुरक्षा पुरविल्याबद्दल कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.