भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला असून दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक आज रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.
वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी वीजपुरवठा, शेती कर्जमाफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषणआहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे.
रविवारी १२ मार्चपासून दिंडोरी (जि.नाशिक) येथून लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये २० ते २५ हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलक मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. तरी सरकारने या आंदोलकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.