Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, तो चमत्कार तर घडणारच चमत्कार कोणाच्या बाबत घडेल ते उभा महाराष्ट्र बघेल

चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.

राज्याची विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. उस्मानाबाद जिल्हयातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विधानसभेच्या सदस्यांमधून दहा विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्याची निवडणूक लागली आहे, ११ उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजणं हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं आहेत. आमच्या दोन सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही ५१ आहे. कोटा साधारण २६ चा आहे. अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीलेले आहे. त्यामुळे यदा कदाचित एखादं मतं दिलेलं बाद झालं, काही तिथे अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी नजरचुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते. जसे मागील वेळेस एका शिवसेनेच्या सदस्यांस आमदार म्हणून दिलेलं मत हे बाद ठरवण्यात आलं. म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अपक्षांकडे सन्मानाने मते मागितली पाहिजेत. अपक्षांना काहींनी फोन केलं हे खरं आहे. मी स्वत: अनेकांना फोन केले. अशोकराव, बाळासाहेबांनी अनेकांना फोन केले. पहिलं आणि दुसरंच मत महत्वाचं नाही, तर तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांकही महत्वाचा असतो, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक आणि दोन एकमेकांना दिल्यानंतर तीन आणि चार बद्दल आम्ही ठरवू. आम्हाला थोड्या मतांची गरज आहे. मी, जयंत पाटील, भुजबळ आम्ही सर्व चर्चा करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘अग्निपथ’ वरुन अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. ही योजना जाहीर करताना केंद्राने वयाचा निर्णय घेतला नव्हता, मात्र तरुणांचा संताप लक्षात घेता वयाच्या अटीमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने अगोदरच घ्यायला हवा होता, म्हणजे हा रोष वाढला नसता असा टोलाही त्यांनी लगावला.

तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. कोरोना काळात अनेक रोजगार गेले आहेत त्यामुळे तरुणांच्या भावना आम्ही समजून आहोत असेही ते म्हणाले.

दरम्यान विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक होईल. एकतर २० जून रोजी सकाळी लवकर किंवा आदल्या रात्री उशीराने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक होईल. त्यावेळी ते काही आदेश आणि कोटा जाहिर करणार असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *