राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक जाहिर झालेली असताना आणि त्यातच राज्यातील १४ महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेंच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आता मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणूकाही कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला. मात्र आज बोरिवलीतील एका उड्डणापुलाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र या उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
बोरिवली पश्चिम येथील उड्डाणपुलाचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुरू झाले होते, आता शिवसेना या कामाचं श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे स्थानिक आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर लावून घोषणाबाजी केली. त्यामुळे सेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. पण घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आले.
खरंतर, मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल होतात. या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोरिवली पश्चिमेतील आर. एम भट्ट मार्ग येथे महापालिकेच्यावतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. बोरिवली पश्चिमेतील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे.
यापूर्वी भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनाजवळ अशीच घोषणाबाजी आणि एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी तर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात माहिम पोलिस स्थानकात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळले होते. पंरतु आज भाजपा कार्यकर्त्ये थेट कार्यक्रमाच्या स्थळी जात घोषणाबाजी सुरु केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनीही घोषणाबाजी केली.