राज्यात काही ठराविक राजकिय नेत्यांच्या आगमनाप्रित्यर्थ कार्यकर्त्यांकडून एक विशिष्ट घोषणा देण्याची पध्दत मागील वर्षात रूढ झाली होती. परंतु हल्ली ही पध्दत दिसेनाशी झाली असताना आज अचानक शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आगमनावेळी शिवसैनिकांकडून देण्यात येणारी घोषणा आज विधानभवन परिसरात ऐकायला मिळाले शिवसेनेचे आमदारही काही काळ गांगरल्याचे चित्र पहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात एक आदरयुक्त दरारा होता. त्यामुळे ते जेव्हाही जाहिर सभेच्या किंवा प्रचारसभेच्या ठिकाणी पोहोचले की शिवसैनिकांकडून एकच घोषणा उठायची.. कोण आला रे कोण आला…
अगदी तशीच घोषणा भाजपाच्या आमदाराने सकाळी त्यांच्या एका नेत्याने विधिमंडळ परिसरात दिली. त्यामुळे परिसरात असलेल्या शिवसेना आमदारांनी मोठ्या उत्सुकतेने आवाजाच्या आणि विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले. परंतु त्या शिवसेना आमदाराचा चांगलाच भ्रमनिरास झाला आणि भाजपा नेत्याला पहात तेथून काढता पाय घेतला.
विरोधी पक्षाकडून दररोज मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच सभागृहात कामकाजात सहभागी होत सरकारवर टीका करण्याची संधीही सोडत नाहीत.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपा आज राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा आयोजित केला होता. पण, १० वी आणि १२ वी परीक्षांचा कालावधी असल्याचे कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे भाजपाचा हा मोर्चा केवळ आझाद मैदानापुरताच मर्यादित राहिला.
काल विधानसभेत विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावरून मोठा गौप्यस्फोट केला. व्हिडीओ बॉम्ब टाकून त्यांनी विधानसभेत एकच गहजब केला. त्यातच मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने सरकार घाबरले असा आरोप भाजपा आमदार करत होते.
अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दररोज भाजपाकडून कामकाज सुरु होईपर्यंत विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार आजही भाजपा आमदार नबाव मलिक यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन करत होते. याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात आगमन झाले. त्यांना पाहून भाजपा आमदार उभे राहिले आणि ती शिवसेनेची आरोळी उठली.. कोण आला रे कोण आला… महाराष्ट्राचा वाघ आला.
सकाळची वेळ. सभागृहात जाण्यासाठी आमदाराची लगबग सुरु झालेली अशातच ही ऐकल्याने काही शिवसेनेच्या आमदारांनी तेथे धाव घेतली. पण, कोण आला… हे फडणवीस यांच्यासाठी म्हटले गेल्याचे पाहून त्यांनी तेथून काढता पाय घेतला.