मराठी ई-बातम्या टीम
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या विषयी सवाल करत भाजपाविरोधी लढ्यात काँग्रेस कुठे आहे असा सवाल केला. तसेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले. त्यानंतर राज्यातील काँग्रेसकडून बॅनर्जी यांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भूमिका मांडली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीयस्तरावरील भाजपाविरोधी आघाडी स्थापन करण्याबाबतची भूमिका मांडली. ती योग्यच आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विरोधात जो लढा दिला तो आहे. परंतु देशात काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी होणे शक्य नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचे एक कार्यकर्त्यांचे जाळे आहे. देशभरात जाळे आहे. अनेक राज्यात त्यांचे विरोधी पक्षनेते आहेत, मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आमच्या सोबत असून महाविकास आघाडीतही मतभेद आहेत. पण आम्ही युपीएचे प्रतिक असल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले.
देशात युपीए कुठे असल्याचे दिसते असा सवाल मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात एनडीए तरी कुठे आहे. त्यामुळे युपीएत नवे पक्ष आले पाहिजे नवे मित्र जोडले गेले पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तर युपीए वाढेल, शिवसेनेलाही अनेकजण सोडून गेले. तरीपण शिवसेना मजबूत उभी आहे. प्रत्येक पक्षाला वाढीचा अधिकार आहे. त्यानुसार युपीए झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
देशात भाजपाने सुरु केलेल्या गोष्टींच्या विरोधात लढा उभारले गेले पाहिजे असे सांगत महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या परीने लढा देण्याचे काम करत आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस वगळून कोणतीही आघाडी उभी करता येणार नाही. यावेळी युपीएचे नेतृत्व कोणी करावे असा सवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला असता ते म्हणाले की, युपीएचे नेतृत्व सोनिया गांधी या करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आगामी काळात युपीएच्या नेतृत्वाखाली शिवसेनाही निवडणूका लढवेल असे संकेत त्यांनी यावेळी दिले.