मुंबई: प्रतिनिधी
आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्या पध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
साखर कारखाना ईडीने सील केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत ते ईडी करत असेल. परंतु अजितदादा व त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत अशी माहिती त्यांनी दिली.
काल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्यावर साखर कारखान्यांच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच अजित पवार यांनीही जमडेश्वर साखर कारखान्यात खरेदीत घोटाळा केल्याची बाब आज पुढे येत ईडीने याप्रकरणी कारखाना सील केल्याचे उघडकीस आले. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी वरील आरोप केला.
राज्यांना अधिकार द्या राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल
केंद्राने घटना दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करावं जर केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्या राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल अशी भूमिका त्यांनी मांडली.
काल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली. आम्ही आधीपासूनच कलम १०२ मधील घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. मराठा आरक्षण असेल किंवा एसईबीसी कॅटेगरीतील आरक्षण असेल हे देण्याचा अधिकार राज्यांना राहिलेला नाही. त्यासाठीच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अधिकार देण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले तर राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण असतील त्याबाबतीत निर्णय घेऊ शकते. परंतु घटना दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले..