सांगली: प्रतिनिधी
आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत प्रतिक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे जाहीर केले.
लस अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे आणि परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त केला शिवाय या तरुणांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. आधीच आर्थिक चणचणीत असलेल्या राज्य सरकारला मदत म्हणून ज्यांची लस घेण्याची क्षमता आहे अशांनी स्वत:बरोबर आणखी पाच जणांच्या लसींचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन प्रतिक पाटील यांनी नुकतेच केले. जेणेकरून राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताण काही प्रमाणात कमी होईल आणि लसीकरणही होईल असा उद्देश या अभियाना मागे आहे.
त्यासाठी #Citizens4Maharashtra हे अभियान सुरू केले. काँग्रेस युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सत्यजीत तांबे यांनीही ज्यांची क्षमता आहे त्यांनीही मोफत लस घ्यावी मात्र त्याचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावेत असे आवाहन केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीत २ कोटी ५ लाख रूपयांचा निधीही जमा केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राष्ट्रवादी वेलफेअर फंड आणि पक्षाच्या आमदार खासदारांचे एक महिन्याचे वेतन मिळून २ कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले.