मुंबई : प्रतिनिधी
मंत्री महोदय ज्या गावात योजना सुरु असल्याचे सांगत आहेत. त्या गावातील नदीच्यावरील विहीरीत पाणीच नाही. पाणी नसताना तेथे पाणी पुरवठ्याची योजना कशी सुरु असेल असा सवाल आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी उपस्थित केली. तसेच मंत्री महोदय चुकीचे उत्तर देत असून चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अशीच परिस्थिती राहुल बोंद्रे यांनीही अशीच परिस्थिती कथन करत आपला संताप व्यक्त केला.
विधानसभेत तारांकित प्रश्नात्तोराच्या तासा दरम्यान त्र्यंबकराव भिसे, राहुल बोंद्रे यांनी पाणी पुरवठ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.
त्यास उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, रेणापूर तालूक्यातील गोपाळवाडी,सुकणी, दिघोळ देशमुख, असराची वाडी, मुसळेवाडी, हारवाडी येथे पाणीटंचाई भासत असून पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील योजनांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी दिघोळ देशमुख या गावामध्ये पाणी पुरवठा योजना सुव्यवस्थितीत चालू असून नदीवरील विहरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच इतर गावात सुद्धा योग्य पद्धतीने पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले.
यावर लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी हरकत घेत, मी राहत असलेल्या गावाजवळ दिघोळ देशमुख हे गाव आहे. या गावातील नदीवरील विहरीतच पाणी नाही तर योजना कशी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्री यांनी योजना सुरू असल्याचे पु्न्हा उत्तर दिले. यावर आमदार भिसे चांगलेच संतापले आणि मी त्या विहरीवर जाऊन आलो आहे त्या विहरीत पाणीच नाही तर सभागृहात चूकीचे उत्तर कसे दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला. तरीही योजना सुरु असल्याचे उत्तर पुन्हा मंत्री लोणीकर यांनी दिले. त्यामुळे आमदार त्र्यंबकराव भिसे आणि चिखलीचे आमदार राहूल बोंद्रे हे चांगलेच संतापले. आम्ही ४५ दिवस आगोदर लेखी प्रश्न विचारतो. ४५ दिवस आगोदर लेखी प्रश्न विचारून देखील जर चूकीची उत्तरे दिली जात, असतील तर हा सभागृहाचा अपमान असल्याची भावना या दोन्ही आमदारांनी विधानसभेत व्यक्त केली.
चिखलीचे आमदार राहूल बोद्रे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील व्यायामशाळेच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बुलढाणा तालुक्यातील इरला येथील आदर्श क्रीडा, सांस्कृतिक,जनजागृती ग्रामविकास बहूउद्देशिय मंडळ या संस्थेने पैसे उचलून व्यायामशाळेचे बांधकाम केले नाही. या संदर्भात प्रश्न विचारला होता. याप्रश्नाला देखील अधिकाऱ्यांकडून चूकीचे उत्तर देण्यात आले . यावेळी क्रीडामंत्री हे उत्तर देत असतांना आमदार बोंद्रे यांनी उत्तराला आक्षेप घेतला. आम्ही आमदार ४५ दिवसाआगोदर तारांकित प्रश्न पाठवितो आणि अधिकारी जर चुकीचे उत्तर देत असतील तर तो सभागृहाचा अपमान असल्यामुळे अशी चूकीचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना देखील चूकीची उत्तरे दिली जात असल्याचे यावेळी समोर आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय वागणूक दिली जात असेल हा मोठा विषय आहे.