मुंबई : विशेष प्रतिनिधी
मागील वर्षभरापूर्वी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत सर्वसामान्य नागरीक सापडला आहे. त्यात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता पुन्हा कडक निर्बंध लागू केलेले असल्याने अप्रत्यक्ष रोजंदारी आणि हातावर पोट असणारे हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने जनतेमध्ये संभ्रवस्था निर्माण झाली आहे.
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होताच जवळपास महाराष्ट्रासह ६ ते ७ राज्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली. केंद्र सरकारने या वयोगटानुसार प्रत्येक राज्यात लसीकरण करावे यासाठी प्रोटोकॉल तयार केले. त्यानुसार लसीकरणाची सुरुवात झाली. मात्र या दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्यास सुरुवात झाल्याने एकाच घरात राहणाऱ्या व्यक्ती किंवा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात संशयाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या घेरीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आणखी गोंधळ उडाला आहे. त्यात बाधितांच्या संख्येत ११ लाखाने वाढ होण्याची शक्यता असल्याने लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत देण्यात आल्याने राज्यातील सर्वसामान्यांमध्ये याचीच चर्चा सुरु झाली आहे.
आधीच आर्थिक विंवचनेत असलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला रोजगार, वेतन कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर छोटे व्यापारी यांनी व्यवसायासाठी भरलेल्या माल खरेदीत गुंतविलेली रक्कम तरी वसूल होणार कि नाही असा प्रश्न पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरीकांपासून ते व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले…
जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल, आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहोत, पण तो करावा लागू नये अशी अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण करोनाला रोखलं तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत आहोत. आपण लॉकडाऊनच्या समर्थनात नसल्याचं स्पष्ट करत पण जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणं हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो.
करोनाची साखळी तोडणं हा लॉकडाउनचा मुख्य हेतू असतो. जगभरात आपण पाहिलं तर १५ दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाउन हा गरजेचा असून त्याचं कडक पालन झालं पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो.
मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार काय म्हणाले..
राज्यात करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान राज्य सरकारने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा केली असून वीकेण्ड लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
विकेण्ड लॉकडाऊनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावं लागेल. परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरी देखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यास सांगणार आहे.
कडक लॉकडाऊन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. करोनाचा प्रसार झालेला असून अशा परिस्थितीत पूर्णत: लॉकडाउनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज आहे.