मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शाळा, महाविद्यालये अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना सध्या मर्यादीत वेळेच्या स्वरूपात ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड बनले आहे. यापार्श्वभूमीवर सीबीएसईप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरु करण्यास केंद्र आणि सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात शालेय शैक्षणिक वर्ष प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली. मात्र त्यासही मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सीबीएसईनेही प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालये सुरु होणार नसल्याने त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
इ.३ री ते इ.१२ वी साठी आता जिओ टी.व्ही वर एकूण १२ Channel सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने ४ माध्यमांमध्ये शैक्षणिक Channel सुरु केले आहेत. इ.१ ली ते इ.१० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ YouTube Channel सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.