राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र पुरस्कृत SAG ( Scheme for Adolescent Girls) अर्थात किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रूपयांवरुन साडेनऊ रूपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा कौशल्य प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
अकरा ते चौदा वयोगटातील शाळाबाह्य मुलींचा विकास व सक्षमीकरण करून त्यांना पोषण आहाराचा लाभ देणे, त्यांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे, लाभार्थी मुलींना आरोग्य, स्वच्छता, पोषण, प्रजनन व लैंगिक आरोग्य, कुटुंब आणि बालकांची काळजी याविषयी जाणीव जागृती करणे, तसेच गृह, जीवन आणि व्यवसाय कौशल्ये उंचाविण्याकरिता मदत करण्यासह त्यांना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. ही योजना अंगवाडी सेविकांतर्फे राबविण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील बीड, नांदेड, मुंबई, नाशिक, गडचिरोली, बुलडाणा,कोल्हापूर, सातारा, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण ‘सबला’ योजना या केंद्र पुरस्कृत योजनेत केंद्राने काही बदल सूचविले आहेत. त्यानुसार नव्या योजनेंतर्गत लाभर्थ्यांना प्रतिदिन द्यावयाचा ३०० दिवसांचा लाभ हा पाच रूपयांवरून साडेनऊ रुपये करण्यात आली असून पूरक पोषणासाठी १६ कोटी ३० लाख रूपये व त्याव्यतिरिक्त सेवांसाठी ६ कोटी ८ लाख रूपयांचा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आहाराकरिता राज्य आणि केंद्र शासन ५०-५० टक्के आपला हिस्सा देणार असून इतर सहाय्यक अनुदानाकरिता केंद्र शासन ६० तर राज्य शासन ४० टक्के आपला हिस्सा देणार आहे.