मुंबई : प्रतिनिधी
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आली. त्या गाडीत एक पत्र मिळाले असून त्या पत्रात मुकेश भैय्या, भाभी असे शब्दप्रयोग करत त्यांना उडविण्याची धमकी दिली. धमकी देणारा असा शब्दप्रयोग करू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करत त्या पत्रातील भाषेचा टोन हा गुजराती भाषेच्या असल्याचे सांगत यात गुजरात कनेक्शन असल्याचे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले.
तसेच याप्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पोलिस आणि प्रशासनाचा गेलेला विश्वास परत मिळवावा अशी मागणी त्यांनी केली.
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे एक व्हायरल झालेल्या पत्रातील आरोपाच्या अनुषंगाने कृष्णकुंज या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केलेले आरोप हे धक्कादायक स्वरूपाचे असून त्याची चौकशी झालीच पाहिजे. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करत आतापर्यंत अतिरेकी बॉम्ब ठेवत होते. मात्र आता पोलिसच बॉम्ब ठेवत आहेत, हा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पोलिस, प्रशासन यांचा गेलेला विश्वास परत मिळविण्यास मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चांगले संबध आहेत. त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला अंबानी कुंटुबिय हजर होते. इतके संबध असताना केवळ पैशासाठी त्यांच्या घराजवळ स्फोटकाची गाडी पोलिस अधिकारी नेवून ठेवू शकतील का? ते राहतील का पोलिस दलात? त्यामुळे हि थिअरी बंद करावी आणि ती गाडी कोणी पार्क केली, त्यात जिलेटीनच्या कांड्या कोठून आल्या या मुळ प्रश्नाचा तपास होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
अचानक कोणता तरी विषय येतो आणि राज्यातील इतर महत्वाचे विषय मागे पडले जातात. त्यामुळे त्या मुळ विषयाला फाटे फोडण्याऐवजी मुळ प्रश्न असलेल्या विषयाचा तपास झाला पाहिजे अशी मागणी केली. या सर्व गोष्टींमुळे आपला देश अराजकतेकडे जात असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.