चोगले हायस्कूल, बोरीवली येथे महायुथ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्याला आज युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. तरुणांनी सकारात्मक आत्मविश्वास घेऊन प्रत्येक क्षेत्रात काम करावं, यश तुमच्याच हातात आहे. असं म्हणत तरुणांना प्रोत्साहन दिलं. यावेळी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना, घटनाबाह्य मुख्यमंत्री सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरत आहेत. आता गुवाहाटीला गेलेत तिथून आणखी कुठे जाणार? असा सवाल करत महाराष्ट्रासाठी काम करायचं त्यांच्या कधीच मनात नव्हतं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला.
राज्यपाल हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, तर रामदेव बाबांचं वक्तव्य दुर्दैवी
महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत. यांनी आम्हाला सत्तेतून बाहेर काढून टाकलं, विधानसभा अध्यक्ष आमच्या काळात नेमला नाही. सरकार बदलल्यावर नंतर लगेच नेमला गेला. तसेच १२ आमदारांचा देखील प्रश्न प्रलंबित ठेवला. त्यामुळे हे राजकीय राज्यपाल हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे. हे राज्यपाल राज्यासाठी चालणार नाही. हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच रामदेव बाबा यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. रामदेव बाबांचं वक्तव्य अतिशय दुर्दैव आहे. आपण महिलांकडे बघतो कसं ? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे सरकार पडेल तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही
सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे वारंवार मंत्री मंडळ विस्ताराबाबत सांगितलं जात आहे . विस्तार होणार अस सांगितले जातय, मात्र हे सरकार पडेल तरी विस्तार होणार नाही. विस्तार होत नाही त्यामुळेच विस्ताराच्या विमानाने फिरत आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मिंदे मंत्रीमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली.