राज्यातील सत्तानाट्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवस केला होता. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान दुपारी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कामाख्या देवीकडे काय प्रार्थना केली? यासंदर्भात माहिती दिली.
आज आम्ही सर्वांनी कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावे. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, चांगले, आरोग्य लाभू दे. शेतकरी, कष्टकरी अशा सर्वच घटकांना सुख, समाधान मिळावं, अशी प्रार्थना आम्ही कामाख्या देवीच्या चरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आज आम्ही आसाममध्ये आलो आहे. इथल्या मुख्यमंत्र्यांनी तीन मंत्री आमच्या स्वागताला पाठवले होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांशीही माजी भेट होणार आहे. त्यांनी ज्याप्रकारे आमचं स्वागत केलं. त्यासाठी मी आसाम सरकारचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.
कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. राज्यात सर्व सामान्य जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी बोलाताना तारतम्य बाळगले पाहिजे. आम्ही श्रद्धेने, भक्तीने इथे आलो आहे. आम्ही चार महिन्यापूर्वी इथे आलो होतो. त्यानंतर इथे येण्याची सर्वांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही पुन्हा दर्शनाला आलो आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
आसाममध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा आनंद आहे. आज कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याचं भाग्य आम्हाला मिळाले आहे. आम्ही आज कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत महाराष्ट्रात जाणार आहोत, असेही ते म्हणाले.