नागपूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक कामांवर जातात. त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला.
विधानसभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि एकनाथ खडसे यांनी उपप्रश्न विचारले. याप्रश्नाला राज्याच्या महिला व बाल कल्याण आणि रोहयो मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.
यापूर्वीच्या सरकारने रोजगार हमी योजनेवरील कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देण्याचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे घेतला होता. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता म्हणून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होतो. पूर्वी विरोधात होतो. त्यामुळे सातत्याने प्रश्न विचारायचो आता सत्तेत आलोय तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची जबाबदारी असल्याची आठवण खडसे यांनी राज्य सरकारला करून देत एकाबाजूला भाजपचे सर्व आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी काळातील सरकारच्या चुका काढून विरोधांना दाबण्याचा प्रयत्न करत असताना खडसे यांनी जून्या सरकारचा चांगला निर्णय घेतला असल्याचे सांगत फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला.
खडसे यांच्या प्रश्नावर रोहयो मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यावर आपण निर्णय घेवू शकत नाही.
त्यावर खडसे यांनी हरकत घेत मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवित असल्याची आठवण करून दिली. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सदर विषयाची माहिती घेवून सदर माहिती सभागृहाला दिली जाईल असे आश्वासन दिले.