केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय काल शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेना म्हणजे सळसळत रक्त. मात्र काही उलट्या काळजाच्या माणसांनी होय त्यांना काळीज आहे पण ते उलटं आहे. त्यांना सगळं काही देऊनही त्यांनी आईच्याच काळजात कट्यार खुपसली असल्याचा आरोप शिंदे गटावर केला.
आतापर्यत जे त्यांना करून दाखवणं शक्य झालं नाही. ते त्यांनी आमचीच माणसं फोडून करून दाखवलं असा खोचक टीकाही त्यांनी भाजपावर केली.
तुमचा शिवसेनेशी संबध काय? असा सवाल शिंदे गटाला उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले, माझं तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही भाजपात जा नाही तर नवा पक्ष काढा. हिंमत असेल तर बाळासाहेबांचे नाव न वापरता तुम्ही निवडणूकीला सामोरे जा. कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलं होतं. ते नाव बाळासाहेब माझ्या वडीलांनी रूजवलं, वाढवलं. या शिवसेनेनेच तुम्हाला सगळं दिलं अनं आज तुम्हीच त्याला संपवायला निघालात असा आरोपही त्यांनी केला.
आणिबाणीच्या काळात शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी अनेकांकडून करण्यात येत होती. तशा आशयाचा प्रस्तावही त्यावळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर आला. परंतु त्यांनी त्यावर सही केली नाही. शिवसैनिकांवर खटले दाखल होत होते. पोलिसी कारवाई होत होती. पण बंदी घातली नाही. आणिबाणीच्या काळात सत्ता काँग्रेसची होती. परंतु त्यांनी जे केलं नाही ते तुम्ही करून दाखवलंत. त्यामुळे खरे शत्रु कोण तुम्ही की काँग्रेस ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्या शिवसैनिकांना तुम्ही छळत आहात. या परिस्थितीत मी डगमगलो नाही. माझे वडील नेहमी सांगायचे की, तुझ्यात जर आत्मविश्वास आहे, तर जगातील कोणतीही शक्ती तुला रोखू शकणार नाही असा इशारा उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता देत त्यामुळे माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर आणि तुमच्या बळावर मी पुढे चाललो आहे. ही एक शेवटची लढाई जिंकलो की आपण सगळं मिळवलं असेही ते म्हणाले.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागे पर्यंत हा निकाल लागायला नको होता. पण हा निर्णय आला. तसा हा निर्णय अनपेक्षितच आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेवेळी जो नारळ फोडण्यात आला. त्यावेळी त्या नारळाच्या पाण्याने भिजलो होतो. पण आज शिवसैनिकांच्या अश्रुंनी भिजलोय अशी भावनिक साद घालत आयोगाच्या निकालानंतर आपण धगधगती मशाल, उगवता सुर्य आणि त्रिशुळ हे चिन्ह आणि तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशी नावे दिली आहेत. त्यामुळे माझी आयोगाला विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर चिन्ह आणि नावं आम्हाला द्यावं अशी मागणी करत त्यांनी पलिकडून अर्थात मिंदे गटाकडून काय मागितलंय ते अद्याप समोर आलेलं नाही असेही ते म्हणाले.
आम्हाला जनतेच्या दरबारात जायचं आहे. कारण जनता जर्नादनच सर्वश्रेष्ठ आहे. आज कोजागिरी पोर्णिमा आहे. मात्र रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे जागरूक राहण्याची वेळ असल्याचा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.