काही दिवसांपूर्वी देंवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबरी पाडायला तेथे एकही शिवसैनिक नव्हता की नेता नव्हता. मी स्वत: तेथे होतो. मी पाडण्यासाठी गेलो. फडणवीसची मी बाबरी पाडायला गेलो होतो म्हणतो, ती काय शाळेची सहल होती का? असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत फडणवीस तुमचं वय काय? बोलता काय? अशी टीका करत फडणवीस तुम्ही बाबरीच्या ढाच्यावर साधा पाय जरी ठेवला असता ना तरी बाबरी कोसळली असती खोचक टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
त्यादिवशी तुम्ही भगव्या टोप्या घालून गेला होतात. तुमचं हिंदूत्व म्हणजे भगव्या टोप्या घालणे असं आहे का? हिंदूत्व हे टोपीत नसतं तर त्या टोपीखाली असलेल्या डोक्यातील मेंदूत असावं लागतं. तुमच्या मेंदूत हिंदूत्व नाही. म्हणून तुमच्या टोप्यांमध्ये हिंदूत्व आलं आहे. बर मग तुमचं हिंदूत्व हे जर भगव्या टोप्यात आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी काळी का? असा सवाल कर फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.
आमचं हिंदूत्व हे गदाधारी असल्यावरून ते म्हणाले की, गधादारी आहे. बरोबर आहे त्याचं म्हणणं पण अडीच वर्षापूर्वी त्यांना आम्ही सोडलं त्यामुळे आम्ही गध्याला सोडलं. गाढवासमोर वाचली गीता कालच्यापेक्षा आजचा गोंधळ बरा असा टोला लगावत गाढवचं ते गाढवाला काय कळणार अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
देशाचा स्वातंत्र लढ्यात तुमचाही पक्ष नव्हता आणि आमचाही पक्ष नव्हता. पण तुमचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ होता. स्वातंत्र्य चळवळीत संघाने का सहभाग घेतला नाही? असा सवाल करत जर तुमचा सहभाग असेल तर त्याचे दाखल द्या असे खुले आव्हान उध्दव ठाकरे यांनी भाजपाला देत तुमचा पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही नव्हता. नाही तुमचा बाप भारतीय जनसंघ होता. आणि त्यावेळी झालेल्या निवडणूकीत त्या महाराष्ट्र संयुक्त समितीतून जनसंघ बाहेर पडला. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र हे तेव्हापासून असल्याचा जाहीर आरोप करत तुमचा बाप जरी आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकणार नाही असे आव्हान देत बुलेट ट्रेन साठीच सुरु करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी भाजपासह नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
तुमचं हिंदूत्व म्हणजे थाळ्या बडविण्याचे हिंदूत्व असून कोरोना काळात तुम्ही ज्या काही थाळ्या बडवायल्या लावल्या त्या थाळ्या अद्यापही रिकाम्या आहेत. त्यात अन्न देण्याचे काम आम्ही करत असल्याचे सांगत काहीजण म्हणतात मोदींनी मोफत अन्न दिलं. अरे पण त्या उज्ज्वला गॅस योजनेचे तेरा वाजले, महागाई प्रचंड वाढली मग काय दिलेले मोफत अन्न काय चने-फुटाणे खाल्यासारखं कच्चच खायचं का? अशी टीका करत मोदी सरकारवरही टीका केली.
उद्या काय ते उत्तर सभा घेणार म्हणे मग मी परवा घ्यायची का? असा खोचक टोला लगावत हेच करत रहायचं का? असे म्हणत ते पुढे म्हणाले की, काहीही केलं तरी राज्यातलं सरकार पडत नाही म्हणून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होत असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. मात्र राज्यातील वातावरण अस्थिर करण्यासाठीच भोंगा, हनुमान चालिसा सारखे विषय मुद्दाम आणले जात असल्याचा आरोप करत पण आम्ही संयमी आहोत. तुम्ही कितीही काहीही केले तरी राज्यातील वातावरण आम्ही अस्थिर आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात एवढी महागाई वाढली आहे. मात्र त्यावर कोणी बोलायला पुढे येत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गॅसचे दर वाढत आहेत. रावणाची लंका दुसऱ्यांदा पेटली. का पेटली तिथल्या लोकांना आधी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी अशीच फुस लावली. आता तेच लोक तेथील सत्ताधाऱ्यांना पळवून मारत आहेत. आपलाही देश दुर्दैवी परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस सत्तेत असताना त्यावेळचे भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी हे बैलगाडीने संसदेत गेले होते. का तर पेट्रोलच्या दरात वाढ केली होती म्हणून. पण ती वाढ किती होती माहित आहे का? फक्त ७ पैशांची भाव वाढ करण्यात आली होती. पण आताचे भाजपाचा एकही नेता महागाईवर बोलायला तयार नसल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
कश्मिरी पंडित म्हणतात आमचा बळीचा बकरा केला जातोय. हे काश्मिरी फाईल्सचं पुढचं पान आहे का? असा सवाल करत तो राहुल भट सांगत होता माझी बदली करा पण त्याची बदली केली नाही. त्याच्यावर सरकारी कार्यालयात घुसून गोळाबार करून त्याची हत्या करण्यात आली. तिथल्या काश्मीर पंडितांना सुरक्षा पुरवायची सोडून नसत्या टीनपाटांना जनतेच्या पैशातून झेड सुरक्षा, वाय सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचा खोचक टोला लगावत ज्यांना गरज नाही अशांना सुरक्षा दिली जातेय तर ज्यांना देण्याची गरज नाही अशांना पुरविली जात असल्याची टीका त्यांनी केली.