शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात समाविष्ट झालेल्या आमदारांची सुरक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढून घेतल्याचा आरोप केला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अशी कोणतीही कृती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.
आज एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक पत्र ट्विट करत शिवसेनेतील ३८ बंडखोर आमदारांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला. तसेच उद्या जर या आमदारांच्या जीवीताएकनाथ शिंदेला काय बरे-वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर असेल असा इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून ३८ आमदारांची यादी असलेल पत्र शेअर केलं असून हे पत्र त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस विभागाला पाठवलं आहे. या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत असे प्रत्युत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले.
आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे असा आरोपही त्यांनी करत आमदारांची यादी सोबत जोडली आहे.
कुणाचीही सुरक्षा काढण्याचे आदेश गृह विभागाने दिलेले नाहीत. उलट या सर्व आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. काही विधानसभा सदस्य इथे नसतील, तर सेक्युरिटीचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसणार नाहीत. ते ऑफिसला जाऊन दुसरं काम करतील. त्यामुळे जाणीवपूर्वक कुणीही काही करत नाही. यात राजकारणाचा भाग नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. pic.twitter.com/gUn4JEyIJq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. @Dwalsepatil
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 25, 2022