मुख्यमंत्री पदावर असताना शस्त्रक्रिया झाल्याने सर्वच सार्वजनिक कार्यक्रमातून प्रत्यक्ष हजेरी लावण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यातच शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतरही राज्याच्या दौऱ्यावर जाता आले नाही. अखेर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आणि मदतीचा हात देण्यासाठी अखेर तब्बल पाच महिन्यानंतर उध्दव ठाकरे हे मुंबईबाहेर पडणार असून पहिला दौरा औरंगाबादचा राहणार आहे. विशेष म्हणजे हा दौरा ऐन दिवाळीतच आणि तोही उद्या रविवारी करणार आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने अधिकृत प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आले आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी केलेल्या बंडानंतर उध्दव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे शिंदे सोबत गेलेल्या ४० आमदारांमधील बहुतांष आमदार हे मराठवाड्यातीलच आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचा पहिला दौरा हा ही मराठवाड्यातच होत आहे. यापार्श्ववभूमीवर बंडखोर आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे हे आले होते. त्यांच्या दौऱ्याला शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता प्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांचा दौरा होत आहे.
शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार मराठवाड्यात गेल्या १५ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उद्या रविवारी २३ ऑक्टोबर २२ रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत असेही सांगण्यात आले आहे.