वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी
एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला लगावला.
राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याचे काम या विधानसभा निवडणुकीत करायचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना कपाशीला ७ हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षात कपाशीला एकदाही ७ हजाराचा भाव दिला नाही. या भागात अतिवृष्टी झाली पीकविमा काढून देखील पैसे मिळाले नाही. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली. पण अजूनदेखील ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यामुळेच शेतकरी उध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याची टीका त्यांनी केला.
शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला या सरकारचा नकार आहे. आपल्या राज्यात कांद्याला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर आज खड्डयांचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. आम्ही खड्डेमुक्त राज्य घडवण्याचा संकल्प केला होता. मात्र या सरकारने खड्डेयुक्त महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार केला आहे. यात अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले पण या सरकारला याचे गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.
हिंगणघाट म्हणजे कापुस. हजारो कामगार काम करत होते. आज काय अवस्था. कापडाचे आगार असलेल्या मुंबईमध्ये गिरण्या बंद पडल्या. कामगार देशोधडीला लागला तेच चित्र आज हिंगणघाट मध्ये पाहायला मिळत असल्याबाबत त्यांनी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
Tags bjp cm fadanavis ncp sharad pawar vidhansabha election-2019
Check Also
सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …