देशातील काहीजण जनतेच्या मनातील बात ऐकण्यापेक्षा फक्त स्वताच्याच मनातील बात ऐकवत आहेत असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष लगावला. ज्यांना देशातील जनतेच्या मनातील ऐकण्याची इच्छा होत नाही अशा मोदी तो गयो असा स्पष्ट इशाराही यावेळी संजय राऊत यांनी केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या काळात आम्ही म्हणत होतो की इंदिरा गांधी आयी है, नई रोशनी लाई है अशा घोषणा देत होतो. त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी देशातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी जनता आणि शेतकऱ्यांच्या मनातील बात जाणून घेण्यासाठी भारतभर फिरत आहेत. लोकांची मने जोडण्यासाठी आणि देशाला जोडण्यासाठी राहुल गांधी हे फिरत आहेत. राहुल गांधी हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते महाराष्ट्रात आले आहेत. ते मुंबईला जाणार आहेत असेही सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात गद्दार आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो, पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता. पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे. ती म्हणजे ‘मोदी तो गयो’ असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान शिंदे गटावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मध्यंतरी जे गद्दार महाराष्ट्रात निर्माण झाले. तसे गद्दार पुन्हा जन्माला निवडणूकीच्या माध्यमातून जन्माला आले नाही पाहिजे असे सांगत गद्दारांना धडा शिकविण्याचे आवाहनही केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले, आज द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे, त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोपही यावेळी केला.