Breaking News

राहुल गांधी यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक विमा योजनेची…

शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक विमा योजनेची पुनर्रचना करणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिले.

भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत. पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पीक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पीक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे, त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेततकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल अशीही घोषणा केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहनही केले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे. त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार असा आरोपही यावेळी केला.

या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, AICC मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, AICC सचिव आशिष दुआ, माजी मंत्री CWC सदस्य यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सरचिटणीस ब्रिजेश दत्त, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, हेमलता पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कम्युनिस्ट नेते माजी आमदार जीवा पांडू गावात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *