मुंबई : प्रतिनिधी
प्लास्टिक बंदीसाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याने याच मुद्यावरून शिवसेना आणि मनसे मध्ये जुंपली आहे. त्यातच आता राज ठाकरे अर्थात काका आपला पुतण्या आदीत्य ठाकरेला घाबरतोय काय ? असा सवाल करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला चांगलाच लगावला. शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड लावला आहे. या निर्णयाला विरोध करत मनसे कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर पोस्टरबाजी केली होती. तसेच प्लास्टिक बंदीचा दंड भरू नका असे जनतेला आवाहनही केले होते. यापार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिले आहे .
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. जनतेने या चांगल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनसामान्यात आदित्य ठाकरे यांची प्रतिमा या निर्णयाने उजळली आहे. त्याची भीती त्यांच्या काकांना वाटते का ? काका पुतण्याला घाबरले का ? असा उलट सवाल केला. मनसे प्रमुख स्वतः काहीही करत नाहीत, जर इतरांनी चांगले काम केले तर त्यांना विरोध करायचा हा एकमेव उद्योग त्यांनी चालवला आहे. याआधी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते. आता त्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दंड न भरण्याचे आव्हान केले, पण कायदा कुणीही हातात घेऊ नये, कार्यकर्त्यांनी कितीही गोंधळ घातला तरी यावेळी इट का जवाब पत्थर से दिया जायेगा असा इशाराही कदम यांनी राज ठाकरे यांना दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीच्या संदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र मुंबई मध्ये पाऊस असल्याने ठाकरे यांनी आजची पत्रकार परिषद रद्द केली असून उद्या ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.