अयोध्येतील राम मंदीरावरून आधीच राजकिय आणि सामाजिकस्तरावर विविध मते मतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येतील रामाच्या मुर्तीसोबत सीतेची मुर्ती का नाही असा सवाल उपस्थित करत सबंध महिलांच्या मनात कुतूहुल निर्माण झाल्याचे मत पुणे जिल्यातील एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले.
यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, अयोध्येतील मंदिरात बाल रूपातील रामलल्ला विराजमान आहेत. तेथे सीतामाईंची मूर्ती का नाही अशी विचारणा करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपला ढोंगीपणा दाखवून दिला आहे, अशी टीका केली.
पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवार आपण मंदिरात जात नाही, आपण धार्मिक नाही अशी शेखी मिरवत असता. धार्मिक नसलेल्या पवार यांना अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही याची चिंता लागावी, हे आश्चर्यजनक आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याचा स्वभाव असल्याने त्यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत. राम मंदिर निर्मिती नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हे पाहून हतबल झालेल्या पवारांनी अशा कुरापती काढणे सुरु केले आहे. आपल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवणाऱ्या पवारांना सीता माईचा कळवळा येतो, यातून त्यांना आलेले नैराश्यच दिसते आहे. राम मंदिरातील मूर्ती बालरूपातील रामलल्ला आहेत, हे माहित नसल्याने पवारांनी अशी वक्तव्ये केली असल्याची खोचक टीका केली.
प्रविण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून उबाठा गटाने कितीही बढाया मारल्या तरी भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविताना प्रविण दरेकर म्हणाले की, विनायक राऊत यांनी १० वर्षे खासदार असताना कोकणासाठी काय केले, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी केली.
महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, आघाडीत तीन पक्ष असल्याने जागावाटपाला थोडा वेळ लागणारच. प्रत्येकाला आपल्याला अधिक जागा मिळाव्यात असं वाटण साहजिकच आहे. आम्हा सर्वांचे लक्ष्य नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे असल्याने जागावाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदार संघात कोणी कितीही दावे केले तरी भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. धैर्यशील मोहिते पाटील पक्षातून बाहेर पडले असले तरी त्याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. माढा मतदारसंघात मोहिते – पाटील यांचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिलेले नाही. उमेदवार निवडताना महायुतीतील तीन पक्ष जिंकून येण्याचा निकष लावतात. या निकषावरच भाजपाला रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघ मिळाला असल्याचेही सांगितले.