विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या डॉ.सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्याकडून झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे नाशिकची लढत चुरसीची झाली आहे. त्यातच या राजकिय नाट्यामागे भाजपा असल्याचा दाट संशय असल्याचे सत्य उघडकीस येत असतानाच भाजपाच्या माजी नेत्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या पाठिंब्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्या. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार का ? अशी चर्चा सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवा, योग्य वेळी खुलासा केला जाईल असे सांगत या पाठिंब्याच्या मागील राजकारणाचे गुढ आणखी वाढविले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बघत राहा. योग्य वेळी तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शुंभागी पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. ठाकरे गट त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शुभांगी पाटील यांनी ही निवडणूक मी लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. एक व्हिडीओ प्रदर्शित करून त्यांनी आपल्या भूमिकेबाबत सविस्तर सांगताना म्हणाल्या, विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपाकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपानेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार का? याची शक्यता संजय राऊत यांनीॉफेटाळून लावली. ही निवडणूक बिनवरोध होणार नाही, असे आज (१४ जानेवारी) संजय राऊतांनी स्पष्ट केले.