खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधिमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होतेय, यासारखे कुठलं भाग्य असू शकत नाही असा नम्रतापूर्वक उल्लेख खासदार सुनिल तटकरे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विधिमंडळातील भाषणांची पुस्तिका आज पक्षाचे नेते प्रफुल पटेल, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना सुनिल तटकरे हे बोलत होते.
माणसाला वेगवेगळ्या पध्दतीची काम करण्याची संधी मिळत असते. परंतु संधी मिळत असताना त्याच्या मागचा मागोवा घेणे त्यापाठीमागचे सिंहावलोकन करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला मिळाले इंग्रजी शिक्षण घेता आलं नाही पण तरीसुद्धा राजकारणाची आणि कामांची ओढ वडिलांमुळे लागली. त्या काळात एका उत्तुंग नेतृत्वाचा सहवास मिळाला ते म्हणजे बॅ. अंतुले यांचा. वयाच्या तेराव्या वर्षी अंतुलेंना कोलाडच्या नाक्यावर पाहिले हा किस्साही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितला.
या व्यक्तींचे प्रसंग आयुष्यात नजरेसमोर येत असतात. आयुष्यात काम करत असताना काही गोष्टी करत असतो म्हणूनच केलेल्या गोष्टींचे सिंहावलोकन करण्याची वेळ आयुष्यात कधी ना कधी येत असते. आज व्यासपीठावर आदरणीय पवारसाहेब नाहीत त्यांची सकाळीच निवासस्थानी भेट घेतली. परंतु आयुष्यभरात जे काही मी कमावले ज्या स्थितीत उभा आहे त्यात पवारसाहेबांचे योगदान त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. काम करण्याची संधी त्यांच्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर मिळाली त्यातून आत्मविश्वास मिळाला. पराकोटीचा अंतर्मुख आणि अंतर्मुख करण्याची संधी सहवासात मिळाली.
तालुका कॉंग्रेसचा सरचिटणीस ते राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस, तालुका कॉंग्रेसचा अध्यक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष, नगरविकास खात्याचा राज्यमंत्री, अन्न धान्य दक्षता समितीचा अध्यक्ष ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री, तालुका वीज निवारण समिती अध्यक्ष ते ऊर्जा मंत्री, जिल्हा समन्वय समितीचा अध्यक्ष ते अर्थमंत्री ही पदे आयुष्यात कशी मिळाली याची माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.
या पुस्तकात विधान परिषदेतील भाषणे आहेत. यात विधानसभेतील भाषण नाही. पुस्तक छोटे आहे परंतु या पुस्तकातील आशय खूप मोठा आहे. आदरणीय पवारसाहेब, अंतुले, इंदिराजी, आबा यांच्याबद्दल बोलणं हा स्नेह, हा संबंध आयुष्यभरासाठी आपण मिळवत असतो. वेगवेगळ्या पदावर गेल्यावर आयुष्यात काय कमावले, उपलब्धी काय असू शकते असा प्रश्न मला पडला आहे. परंतु रोहातील नवरात्रौत्सवातील कार्यक्रमातील एक किस्सा सांगताना ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे लावले जाते यातच मला आयुष्यात सर्व काही मिळाले. पवारसाहेबांनी राजकारणात उभी केलेली जी पिढी आहे त्यांनी योग्य पध्दतीने काम करण्याची मानसिकता तरुण मनात विशेष करुन १५ ते २५ वयोगटातील निर्माण झाली आहे. ज्या विचाराशी मी चाळीस वर्षे प्रामाणिक राहिलो तो विचार माझ्या भूमीत रुजला याच्यासारखा आयुष्यभरात दुसरा कुठला आनंद राहू शकत नाही असेही सुनील तटकरे म्हणाले.
यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या मातेला… मातृभूमीला… कर्मभूमीला… महाराष्ट्राला… भारतमातेला… वंदन करतानाच ज्या मतदारांनी वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली आणि पवारसाहेबांना नतमस्तक होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनीही आपले विचार मांडले.
‘अभिनंदन… अभिवादन’ … खासदार सुनिल तटकरे यांच्या विधानमंडळातील भावस्पर्शी भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्याची ध्वनिफित दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे संपादन करणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर सुत्रसंचालन पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी केले आणि आभार आमदार आदिती तटकरे यांनी मानले.
या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री भास्करराव जाधव, मुश्ताक अंतुले, खासदार फौजिया खान, आमदार सुमन पाटील, माजी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार संजय कदम,माजी आमदार सुरेश लाड, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. तसेच तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख हे पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे या निमित्ताने दिसून आले.